शेटफळगढे, ता 11. : इंदापूर तालुक्यातील निरगुडे परिसरातील खडकवासला कालव्यावरील शेतकऱ्यांच्या मोटर जलसंपदा विभागाने उचलून नेल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आल्याने शेतकरी चिंतातून झाला आहे.
बारामती तालुक्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला उन्हाळ्यात पाणी सोडण्याची तरतूद नसतानाही केवळ राजकीय दबावातून पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जवळपास पंधरा दिवस पाणी सोडण्यात आलेले याचा फटका इंदापूर तालुक्यातील पिकांना बसलेला असून जवळपास पंधरा दिवस उशिराने आवर्तन आले आहे.
अशातच इंदापूर तालुक्यातील पूर्व भागात पाणी जात नाही म्हणून शेतकऱ्यांच्या मोटारी उचलण्याचे कारवाई करण्यात आली. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पासून सर्व कर्मचारी व अधिकारी या कारवाईदरम्यान उपस्थित होते.
वास्तविक इंदापूर तालुक्यात पाण्याचे आवर्तन सुरू असताना जलसंपदा विभागाने बारामती दौंड हवेली या तालुक्यातील विद्युत मोटारी व पाणी गळती रोखणे जलसंपदा विभागाने गरजेचे होते मात्र इंदापूर तालुक्यातच ही कारवाई केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. तसेच कालव्या लगतच्या शेतीपंपांचे विज जोडही तोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखीनच असंतोषाचे वातावरण आहे
या कारवाई वेळी आमच्या मोटारी नेऊ नका आम्ही घेऊन जातो अशी विनंती शेतकरी करीत होते. मात्र अधिकारी ऐकत नव्हते आम्ही आमची कारवाई करतो कारवाईला आडवे येऊ नका अन्यथा आपल्यावर पोलीस कारवाई होईल असे सांगितल्यानंतर शेतकरी बाजूला झाले. तर काही शेतकऱ्यांनी प्रशासनावर व राजकीय व्यक्तींवर रोष व्यक्त करून कालव्यामध्ये १५ ते २० मोटारी ढकलून दिल्या.
सात ते आठ मोटारी जलसंपदा विभागाने जेसीबीच्या साह्याने काढून टेम्पोमध्ये भरून घेऊन गेले. शेतकऱ्यांनी मोठा आक्रोश करून कालव्यामध्ये मोटारी ढकलून रोष व्यक्त केला
————-
चौकट
यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही मोटारी बंद ठेवतो आमच्या मोटारी नेऊ नका अशी विनंती करून देखील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल न घेता कारवाई केली. कारवाई करू नये म्हणून आम्ही राजकीय नेते मंडळींना फोन केले मात्र आमचं दुर्दैव एवढं की आमचे साधे फोन देखील उचलले नाहीत त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी मोटारी कालव्यात ढकलून दिल्या.
—————-