इंदापूर, दि. 22 : “कृषी यांत्रिकीकरण ही केवळ योजना नाही, तर शेतीतील प्रगतीचा पाया आहे. आधुनिक यंत्रसामुग्रीचा लाभ देऊन शेती उत्पादन प्रक्रिया सुलभ करणे, कृषी मजुरांची टंचाई दुर करणे व वेळेची बचत आदींसाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी अशा आधुनिक कृषी उपकरणांचा जास्तीत जास्त वापर करून शेतात परिवर्तन घडवावे.” असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५१ अनुदानित ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित ८ यंत्र व औजारांचे वितरण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वितरण सोहळ्यात तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, लाभार्थी शेतकरी तसेच ट्रॅक्टर कंपनीचे वितरक उपस्थित होते.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या टीमने नियोजन बद्ध कार्यक्रम पार पाडल्याबद्दल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे उत्पादन खर्च कमी होईल. शेती अधिक फायदेशीर बनेल आणि तरुण पिढीला शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. इंदापूर तालुक्यातील एकूण २३,५९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड या योजनेत करण्यात आली आहे. त्यापैकी, ९,८२१ लाभार्थी ट्रॅक्टरसाठी निवडलेले गेले असून 1,003 लाभार्थ्यांनी ट्रॅक्टरसाठी कागदपत्रे अपलोड केली होती.
त्यातून ३२६ लाभार्थ्यांना पूर्व संमती दिली असून त्यापैकी आज ५१ लाभार्थ्यांना अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. तर, एकूण १३,७७६ लाभार्थ्यांची ट्रॅक्टरचलीत यंत्र व औजारांसाठी पात्र असून आज ट्रॅक्टरचलीत ८ औजारांचे वितरण करण्यात आले. प्रथम टप्प्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व यंत्र आणि औजारे वितरण पूर्ण झाले असून, उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या वेळेनुसार व टप्प्याटप्प्याने ट्रॅक्टर आणि औजारे बँकांचे वाटप करण्यात येईल.”
*इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नवा अध्याय*
कृषी मंत्री भरणे शेतकऱ्यांना शुभेच्छा देत म्हणाले, ” दिवाळी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. या पावन दिवशी शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शुभारंभ आपण करत आहोत. या उपक्रमामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती साधनांचा लाभ मिळणार असून शेती अधिक गतिमान आणि उत्पादनक्षम होण्यास मदत होईल. कृषी विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी नेहमीच शेतात नवनवीन प्रगोग करत असतात. आता कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन सिस्टिम आणि आधुनिक तत्रज्ञानाचा वापरून आपण आपला तालुका समृद्ध करूया. तरुणांनी देखील अधिकाधिक कृषी शिक्षण घेऊन आपापल्या शेतात नवनवीन प्रयोग करावेत आणि राज्यासह देशातील शेतकऱ्यांसमोर एक उदाहरण ठेवलं पाहिजे.”