विनायक चांदगुडे
इंदापूर ता.3 : छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्याप या संचालक मंडळात स्वीकृत संचालकाची नियुक्ती केलेली नाही. अशातच कारखान्याच्या संचालक मंडळाचा जवळपास एक वर्षाचा कार्यकाल संपलेला आहे. त्यामुळे उर्वरित चार वर्षासाठी तरी स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक कधीचा मुहूर्त काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
मे 2025 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याची जवळपास दहा वर्षांनी निवडणूक झाली होती. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांचा कार्यकाल सुरू झाला. व सर्व संचालक मंडळाने कामकाजासही सुरुवात केली.
या वर्षभराच्या कार्यकाळात कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व त्यांच्या संचालक मंडळाने अत्यंत चांगल्या पद्धतीने कारखान्याचे कामकाज केले. शेतकऱ्यांचा ऊसही वेळेत गाळपाला गेला व शेतकऱ्यांना ऊस बिलेही वेळेत मिळाली. तसेच पारदर्शी स्वच्छ कारभार व कामकाजात वैयक्तिक लक्ष दिल्याने तसेच ज्यादा साखर उताऱ्याच्या माध्यमातून कारखान्याच्याही प्रगतीला मोठा हातभार या वर्षभराच्या काळात अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून लागला. व यापुढेही लागणार आहे. त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
त्याचबरोबर कारखान्याचे सभासद व माजी अध्यक्ष व कारखान्यावर जिल्हा बँकेचे प्रतिनिधी असलेले व सध्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कृषिमंत्री पदाच्या माध्यमातून राज्यसह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनाही राबविल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवण्याबरोबरच तालुक्यातही गावोगावच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणलेला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच रस्ते चांगले झाले नाही शेतकऱ्यांचा ऊसही लवकर गाळपाला येत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांच्या वजनाला व कारखान्याच्या एकूण साखर उतारा वाढीसाठी होत आहे. तसेच कारखाना कार्यस्थळावरही सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. कारखान्याच्या प्रगतीसाठी व विकासासाठी त्यांच्या कृषी मंत्री पदाचा उपयोग होत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये व कारखान्याच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मात्र छत्रपतीच्या निवडणुकीनंतर माळेगाव कारखान्याची निवडणूक पार पडली. ही निवडणूक पार पडताच एक महिन्याच्या आत या कारखान्यावर स्वीकृत संचालकांची नियुक्ती करण्यात आली. व या स्वीकृत संचालकांच्या कामकाजालाही सुरुवात झाली.
मात्र मागील वर्षभरापासून छत्रपती साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकांची नियुक्ती झाली नसल्याने पाच वर्षातील जवळपास एक वर्षाचा कार्यकाल या स्वीकृत सदस्यांचा वायाला गेला आहे. तसेच कारखान्याच्या स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीच्या आश्वासनांच्या नावाखाली इच्छुकांनी चांगले पळून पक्ष कार्य केल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकातही पक्षाने सर्वच्या सर्व जागा जिंकत चांगले यश मिळविले आहे.
त्यामुळे उरलेल्या चार वर्षासाठी तरी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी आपल्याला असलेल्या अधिकार पदाचा वापर करून तत्काळ या स्वीकृत संचालकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
चौकट
छत्रपतीच्या स्वीकृत संचालक पदी कोणाची जरी नियुक्ती केली तरी काही काळ नाराजी ही राहणारच आहे. पण ती नाराजी टाळण्यासाठी स्वीकृत संचालकांची नियुक्ती वर्षभरापासून न करणे. ही बाब चुकीची आहे. त्यामुळे उर्वरित चार वर्षासाठी तरी या संचालकांची सभासदांच्या हितासाठी तात्काळ नियुक्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा जसा एक वर्षाचा कार्यकाळ वाया गेला तसा आणखी कार्यकाल स्वीकृत संचालकांचा नियुक्ती विना वाया जाऊ नये. अशी अपेक्षा सभासदांमधून व्यक्त होत आहे.







