पळसदेव ता.२७ : ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या हातुन देशाचे जबाबदार व सुजाण नागरिक घडत असतात असे मत राष्ट्रपतीपदक आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त , पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व जिजामाता विद्यालय जेजुरीचे प्राचार्य नंदकुमार सागर यांनी व्यक्त केले.
पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात शिक्षकांच्या मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. विद्यार्थी केंद्रबिंदु मानून गुणवत्तापूर्ण दर्जेदार अध्यापन करणे शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे, संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षकांकडुन घडते असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी अध्ययन अध्यापन ,शालेय निकाल शिष्यवृत्ती , शालेय स्पर्धा परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा , क्रीडास्पर्धा , शालेय शिस्त आदि विषयावर उपस्थित शिक्षकांशी सुसंवाद साधत मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे ,पर्यवेक्षक विकास पाठक , माजी प्राचार्य बिभीषण शेरखाने , मधुसूदन जगताप ,प्रल्हाद गिरमे संपत कड , संजय जाधव ,सिकंदर देशमुख ,प्रतिभा कांबळे ,उज्ज्वला वाघमारे , शुभांगी कोळी , सुदर्शना पवार , आरती वागजकर , शिक्षक – शिक्षकेतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष पवार यांनी केले.