शेटफळगढे ,ता 24 : राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महायुतीत माजी मंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दोघेही सध्या सत्तेत आहेत परंतु यावर्षी पाऊस झाला नाही. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या सर्व नजरा खडकवासला कालव्याच्या आवर्तनाकडे लागल्या आहेत. परंतु गेल्या अडीच महिन्यापासून खडकवासल्याचे आवर्तन इंदापूर तालुक्यात आलेच नाही. त्यामुळे आता सांगा मामा व भाऊ खडकवासल्याच्या आवर्तनाला मुहूर्त कधी ? अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून येत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी खडकवासला कालव्याला सत्तेत असलेले हे दोन्ही आजी-माजी मंत्री कधीचा मुहूर्त काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतात. याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यावर्षी पाऊस न झाल्याने खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु सुदैवाची बाब म्हणजे आज अखेर इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाला वरदान ठरलेल्या खडकवासला प्रकल्पात जवळपास 90% च्या वरती पाणी साठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील आवर्तनवर इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या या गावांमधील ऊस शेतीसह फळबाग लागवडीचे हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय खडकवासला कालव्याच्या लाभ क्षेत्रात अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी असल्याने सध्या या विहिरी देखील भूमिगत जलस्त्रोत असल्याने कोरड्या पडल्या आहेत याचा गावचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे त्यामुळे पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र धरण क्षेत्रातला पाऊस बंद झाल्याने इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याअगोदरच कालव्याचे पाणी बंद करण्यात आले त्यामुळे तालुक्यातील एकाही तलाव कालव्याच्या पाण्याने भरला नाही.
तसेच सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व कुपनलिकालिका देखील कोरड्या पडल्या असल्याने सध्या शेतातील त्पिके जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत तसेच नवीन लागवड देखील उसाच्या झालेल्या नाहीत.
सध्या तालुक्यात दोन्हीही माजी मंत्री जनतेच्या विकासाची तसेच सामाजिक व वैयक्तिक स्वरूपाची जनतेची कामे करीत आहेत. याचा तालुक्यातील जनतेला अभिमान आहे. त्यामुळे या दोघांकडूनही तालुक्यातील खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे अडीच महिन्यानंतरही खडकवासला कालव्याला आवर्तन का आले नाही याचा जाब अधिकाऱ्यांना विचारून तत्काळ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मामा व भाऊंनी पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.